दिवस दुष्काळी सुरूच राहिले
चारा नाही बैल कोमेजले
शेतकरी मन खिन्न जाहले
ठण ठण गोपाळ, ठण ठण गोपाळ
टाळ वाजे जोरात
शेतकऱ्यांची हि अजब कहाणी
घरात नाही दाणा पाणी
अजूनही पावेना वर्षाराणी
ठण ठण गोपाळ, ठण ठण गोपाळ
टाळ वाजे जोरात
दिवसभर तो वण वण फिरला
बँकेतहि तो सगळ्याच मिरला
कर्जाचा डोंगर वाढतच राहिला
रात्रभर ना डोळ्याला डोळा
टाळ वाजे डोक्यात
येणार नाही आता पावसाळा
देऊ काय मी माझ्या पोराबाळा
लाऊन घेतो हा फास मी गळा
माफ करेल मला माझा विठू सावळा
टाळ सहावेना आजीबात
बळीराजाने स्वतःचेच बळी घेतले
पाठोपाठ सारे जन-रान पेटले
शेवटी शेतकरी कर्जमुक्त जाहले
विठूची हि कृपाच न्यारी, छप्पर फाटले
चला टाळ वाजवूया जोरात
पावसाचीही आता कृपा जाहली
दुष्काळलेली जमीन सुखात नाहली
आनंदाला कुणाच्या सीमा न उरली
झटका मरगळ, ठेवा टाळ खाली
चला जाऊया शेतात, चला जाऊया शेतात
- सोमनाथ ठाकरे (पुणे)